वाढणी: २ जणांसाठी

साहित्य:
३/४ कप वाल
फोडणीसाठी:
१ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून सुका नारळ
१ टिस्पून जिरे
१ टिस्पून गूळ
२ आमसुलं
१/४ कप कोथिंबीर
२ टेस्पून ओला नारळ
चवीनुसार मिठ
कृती:
१) वाल कोमट पाण्यात १० ते १२ तास भिजत ठेवावे. नंतर पाणी काढून टाकून भिजलेले वाल मोड आणण्यासाठी पंच्यात ८ ते १० तास गच्च बांधून ठेवावे. डाळींब्यांना मोड आले कि कोमट पाण्यात १० मिनीटे टाकून ठेवावे. डाळींब्या सोलून घ्याव्यात. मोड आलेल्या डाळींब्या हाताळताना त्या अख्ख्या राहतील याची काळजी घ्यावी. साधारण सव्वा ते दिड कप डाळींब्या होतील.
२) कढईत किसलेला सुका नारळ मध्यम आचेवर भाजून घ्यावे. नंतर जिरे खरपूस भाजून घ्यावे. नंतर भाजलेला नारळ आणि भाजलेले जिरे निट कुटून घ्यावे.
३) कढईत तेल गरम करावे. त्यात १/४ टिस्पून मोहोरी घालून तडतडू द्यावी. नंतर जिरे, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. कढीपत्ता आणि कोथिंबीर घालावी. थोडावेळ परतून डाळींब्या घालाव्यात. हलक्या हाताने परतावे. थोडा पाणी घालावे. १ ते २ टिस्पून कुटलेले जिरे-खोबरे, आमसुलं आणि मिठ घालून वाफ काढावी.
४) डाळींब्या अर्ध्या शिजल्या कि गूळ घालून वाफ काढावी. डाळींब्या खुप नाजुक असतात पटकन मोडल्या जातात म्हणून हलक्या हाताने परतावे.
उसळ तयार झाली कि ओला नारळ घालावा. गरमागरम पोळ्यांबरोबर सर्व्ह करावे.
Labels:
Dalimbyanchi Usal, Valachi Usal, Dalimbi Usal
No comments:
Post a Comment